MUMBAI-GOA EXPRESSWAY: ‘मुंबई-गोवा’ची बिकट वाट, सर्वाधिक काळ रेंगाळलेल्या रस्त्यांचे विदारक वास्तव

एखादा रस्ता सातत्याने चर्चेत राहतो, बातमीत राहतो म्हणजे तो नक्कीच खास असणार. सतत त्या रस्त्यावर काहीतरी महत्त्वाचे घडत असणार. इतिहासाला वळण देणाऱ्या घटनांचा हा रस्ता साक्षीदार असणार, असा आपला समज असतो. दिल्लीतील पूर्वीचा ‘राजपथ’ आणि आत्ताचा ‘कर्तव्यपथ’ किंवा ‘जनपथ’ ही नावे ऐकली तरी हीच भावना आपल्या मनात येते. पण मुंबई-गोवा महामार्गाचे नाव ऐकले, की आपल्या मनात येतो तो संताप. गेली वीस वर्षे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या दरम्यान या रस्त्यावरील अपघातांत अनेकांनी प्राणही गमावले. दरवर्षी गणेशोत्सव आला की मुंबईतील कोकणवासींना गावी जाण्याचे वेध लागतात आणि पुन्हा हा रस्ता चर्चेत येतो.

आपल्या देशाची एक गंमत आहे. इथे परस्परविरोधी घटना सातत्याने घडत असतात. गेल्या वीस वर्षांत देशात सर्वत्र महामार्गांचे जाळे विणणे सुरू आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये त्याला प्रचंड वेग आला आहे. आहेत ते मार्ग चारपदरी, सहापदरी करून त्यांचे रूपांतर महामार्गांमध्ये केले जात आहे. ‘बिमारू’ म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राज्यांतही महामार्ग वेगाने उभारले जात आहेत. संपूर्ण देशात होते ते महाराष्ट्रात मात्र सरसकट होत नाही. एकीकडे महाराष्ट्रामध्ये विक्रमी वेळेत समृद्धी महामार्गाचे निर्माण केले जाते; पण दुसरीकडे सर्वाधिक काळ रेंगाळलेले रस्ते महाराष्ट्रातच आहेत. मुंबई-गोवा महामार्ग हे त्याचे प्रमुख उदाहरण. पुणे-सातारा रस्ताही याच मालिकेतला. आता, मुंबई-नाशिक महामार्गाचाही त्यात समावेश करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. असे का होते, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. अमेरिकेच्या बाबतीत असे सांगितले जाते, की अमेरिका श्रीमंत देश आहे म्हणून तेथील महामार्ग चांगले आहेत. वास्तविक, तेथील महामार्ग चांगले आहेत, म्हणून तो देश श्रीमंत आहे. यातील अतिशयोक्ती जाऊ दे; पण उत्तम रस्ते असणे हे प्रगत देशांमध्ये प्रगतीचे एक लक्षण मानले जाते. आपल्याकडची मंडळी परदेशात जाऊन आल्यावर सर्वप्रथम तिथल्या खड्डे नसलेल्या रस्त्यांचेच वर्णन आवर्जून करतात. खड्डेमुक्त, उत्तम वेगाने वाहने चालविता येतील असा, सुस्पष्ट दिशादर्शक पाट्या असणारा, अचानक मध्येच जनावरे न येणारा, ठराविक अंतरावर मदतकेंद्रे, विश्रामस्थाने असलेला असा रस्ता बांधणे हे फार मोठे आव्हान आहे का? अजिबात नाही. कारण हे सगळे निकष पूर्ण करणारे काही रस्ते आपल्या राज्यात, इतर राज्यांतही आहेत. वर उल्लेख केलेल्या मागास राज्यांमध्येही उत्तम रस्ते आहेत.

मग महाराष्ट्रातच असे का होते, असा विचार केला तर एकच उत्तर समोर येते ते म्हणजे अनास्था आणि गैरव्यवहार. चांगला रस्ता बांधला आणि त्याचे पुढील अनेक वर्षे कामच निघाले नाही तर कोणाचे अडते, या प्रश्नाचे उत्तर प्राथमिक शाळेत जाणारा विद्यार्थीही देईल. साहजिकच महाराष्ट्रात गेली काही वर्षे दरवर्षी काम निघणारे रस्ते बांधण्याचेच नियोजन केले जात आहे. दरवर्षी रस्त्यांची दुरुस्ती निघाल्यानंतर ते कोणाच्या फायद्याचे असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यातच सत्ताधारी सातत्याने बदलत राहिले, तर ‘दुरुस्ती’चा वेग आणखी वाढतो, हे आपल्या सगळ्यांना अनुभवावरून कळून चुकले आहे!

मुंबई-गोवा महामार्ग किंवा पुणे-सातारा रस्ता ही अनुभव घेण्याची मूर्तिमंत उदाहरणे आहेत. बरे, ही गोष्ट फक्त महामार्गांची नव्हे, तर शहरातील रस्त्यांचीही आहे. प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात. आपल्याकडे पाऊस फार पडत असल्याने रस्त्यांना खड्डे पडतात, असे सार्वत्रिक खोटे आपल्या माथी मारले जाते. पण ही वस्तुस्थिती नाही. कारण, वर्षातील तीनशे दिवस पाऊस पडणाऱ्या सिंगापूर, मलेशिया, थायलंड यासारख्या देशांमध्येही खड्डे नसलेले रस्ते असतात. त्यांना जे शक्य होते ते महासत्ता होऊ घातलेल्या भारताला का जमत नाही? यावर उपाय म्हणून मग आपले राज्यकर्ते थेट सिमेंटचे रस्ते बांधण्याचाच निर्णय जाहीर करतात. हा रस्ता दुरुस्तीशिवाय अनेक वर्षे टिकतो, असे सांगितले जाते. भले तो बांधण्याचा खर्च दुप्पट तिप्पट का असेना; पण टिकाऊपणा हवा असेल तर थोडा अधिक खर्च व्हायला काय हरकत आहे, असा रोकडा सवाल आपले राज्यकर्ते करतात. पण हे सिमेंटचे रस्ते बांधतानाही नियोजन केले जात नाही. अभियांत्रिकी शास्त्राचे सर्व नियम धाब्यावर बसविले जातात. मग ठिकठिकाणी पाणी साठण्यास सुरुवात होते. रस्त्यावरचे खड्डे परवडले पण हे साठणारे पाणी नको, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर येते. याबाबत कोणाकडे दाद मागणार? कारण आलटून पालटून राज्यकर्ते तेच असतात!

मुंबई-गोवा महामार्गाची स्थिती अशीच काहीशी आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा चार जिल्ह्यांतून हा मार्ग जातो. यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ता उत्तम स्थितीत आहे, असे त्या रस्त्यावरून प्रवास करून आलेले सांगतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निम्मा रस्ता चांगला आहे. पण रायगडला जोडून असलेल्या भागाकडे मात्र या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. याच रस्त्याच्या एक भाग चांगला होतो, पण एक भाग वीस वर्षांमध्ये योग्य पद्धतीने होऊ शकत नाही, याचे उत्तर कोण देणार?

या रस्त्याला पर्याय म्हणून अनेक जण मुंबई-बेंगळुरू महामार्गाचा आधार घेतात. या महामार्गाचाच भाग असलेला पुणे-सातारा रस्ता आहे. या रस्त्यावर असलेली डायव्हर्जन हा चिंतेचा विषय. अगदी आत्तापर्यंत पुणे ते सातारा दरम्यान अकरा ठिकाणी हा रस्ता मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने वळविला गेला होता. आता त्यातील बरीचशी कामे झाले असली तरीही हा रस्ता पूर्णतः चांगला झालेला नाही. त्यातच कराडमधील उड्डाणपुलाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यामुळे हा मार्गही सुकर राहिलेला नाही.

एखाद्या राष्ट्रीय महामार्गाचे काम वीस वर्षांतही पूर्ण होऊ शकत नाही, यावर विश्वास बसत नाही. या कालावधीत महाराष्ट्रामध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्ष सत्तेत येऊन गेले. ‘कोकण हा आमचा बालेकिल्ला आहे’ अशा गर्जना करणारेही सत्तेत येऊन गेले; पण त्यांनाही हा रस्ता मार्गी लावता आला नाही. कारण इच्छाशक्तीचा अभाव. या रस्त्याचे काम वेगाने होत नसल्यामागील कारणे सगळ्यांना माहीत आहेत. या रस्त्याच्या कामात ठिकठिकाणी केला जात असलेला राजकीय हस्तक्षेप, रस्त्यासाठीची सामग्री विशिष्ट कंत्राटदारांकडूनच घेतली जावी यासाठी केल्या जाणाऱ्या खेळ्या आणि या सगळ्यातून वसूल होणारा मलिदा यातील भागीदार कोण आहेत, हे ही लपून राहिलेले नाही.

खरे तर महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला हा कलंक वाटला पाहिजे. एक रस्ता वीस वर्षांत आपल्याला पूर्ण करता येत नाही, याची शरम वाटली पाहिजे. आता तरी यातील अडथळे दूर करून तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी एकमताने प्रयत्न व्हायला हवा. अन्यथा उच्च न्यायालयाने आपल्या देखरेखीखाली हे काम सीमेवर रस्ते बांधणाऱ्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) सारख्या केंद्रीय संस्थेकडून करून घेतले पाहिजे. तरच पुढील गणेशोत्सवापर्यंत काही गोष्टी मार्गी लागतील. अन्यथा पुढील गणेशोत्सवातही ‘मुंबई-गोवा मार्गाची स्थिती बिकट’ अशाच मथळ्याच्या बातम्या वाचायला लागतील हे नक्की...

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-09-07T06:20:15Z dg43tfdfdgfd