Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी जो पदाधिकारी मेळावा घेतला तो याचसाठी घेतल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. युती करायची का? कुणाबरोबर जायचं हे सगळं आपण नंतर ठरवू. मनसेची सत्ता आली पाहिजे यासाठी आपण २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत असं राज ठाकरेंनी जाहीर केलं. लोकसभेला राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. बातमी अपडेट होत आहे.
“विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि घमासान असलेली होणार आहे. या निवडणुकीत मला आपले आमदार निवडून आलेले पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. काय घडतं आहे, काय घडू शकतं? याचं आकलन करा. मी तुम्हाला खरं सांगतो निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तिकिट मिळेल. तिकिट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कुणालाही तिकिट दिलं जाणार नाही. तुम्ही जे बोलाल जे सांगाल जे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी नीट माहिती द्या. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचे पदाधिकारी आणि आपले लोक सत्तेत बसावयचे आहेत. अनेक लोक हसतील हसुदेत काही प्रश्न नाही. मात्र हे घडणार म्हणजे घडणार. “
“युती होईल का? कोणत्या जागा मिळतील? असला कुठलाही विचार मनात कुणीही आणू नका. आपण जवळपास २२५ ते २५० जागा लढवणार आहोत. तसंच आज कुणी कितीही मोठ्याने घोषणा दिल्या तरीही तिकिट पक्कं असं समजू नका. कुणी कुठल्याही भ्रमात राहू नका. तसंच मला काही जणांनी सांगितलं की आपला पक्ष काहींना सोडायचा आहे. त्यांना मी रेड कार्पेट घालून देतो, त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावं. १ ऑगस्टपासून मी महाराष्ट्राचा दौरा सुरु करतो आहे. जिल्हा, तालुक्यात येईन तेव्हा मी तुम्हाला भेटेनेच. मेळावे घ्यायचे की नाही ते नंतर पाहू. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठका नक्की होतील. ” असंही राज ठाकरेंनी सांगितलं.
2024-07-25T08:21:25Z dg43tfdfdgfd