WORLD PRESS FREEDOM DAY: भारतातील पहिलं वृत्तपत्र BENGAL GAZETTE चा इतिहास माहिती आहे का?

पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी ३ मे रोजी जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची राहिली आहे. इतिहासकार बिपन चंद्र यांनी आपल्या ‘मॉडर्न इंडिया’ या पुस्तकामध्ये याबाबतची मांडणी केली आहे. “लोकांपर्यंत देशभक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी वृत्तपत्रांचा वापर केला गेला; तसेच आर्थिक, सामाजिक व राजकीय विचारांच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवण्याच्या उद्देशाने देशव्यापी चेतना निर्माण करण्यासाठी एक मुख्य अस्त्र म्हणून पत्रकारितेकडे पाहिले गेले,” असे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.

‘बंगाल गॅझेट’ हे भारतात प्रसिद्ध झालेले पहिले वृत्तपत्र होते. ते २९ जानेवारी १७८० रोजी पहिल्यांदा प्रसिद्ध झाले होते. आयर्लंडमध्ये जन्मलेले जेम्स ऑगस्टस हिक्की हे या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक होते. ते भारतातील ब्रिटिश नागरिकांना चटपटीत आणि अश्लील बातम्या देणारे वृत्तपत्र होते, असा आजही अनेकांचा समज आहे. मात्र, हिक्की यांचे वृत्तपत्र सरकारी भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या समस्यांवरही बोट ठेवत होते. इतकेच नव्हे, तर या वृत्तपत्राने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवरही वेळोवेळी टीका केली होती. त्यामुळे ते लवकरच ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या रडारवर आले. वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांच्या आतच या त्यावर मानहानीचा खटला दाखल झाल्यामुळे ते बंद पडले. या वृत्तपत्राचा इतिहास नेमका काय आहे, ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : फिरोज ते राहुल गांधी व्हाया इंदिरा- सोनिया: रायबरेली मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?

‘बंगाल गॅझेट’ची कशी झाली सुरुवात?

‘हिक्कीज् बंगाल गॅझेट : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज् फर्स्ट न्यूजपेपर’ या २०१८ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये लेखक अॅण्ड्र्यू ओटिस यांनी या वृत्तपत्राविषयी सविस्तर माहिती दिली आहे. जेम्स हिक्की यांच्या प्रारंभिक आयुष्याबाबतची माहिती उपलब्ध नाही. मात्र, त्यांचा जन्म १७३० साली आयर्लंडमध्ये झाला असावा. आपले आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी ते नवनव्या संधींच्या शोधात होते. त्या शोधातूनच ते भारतात आले. तेव्हा भारताला ‘ब्रिटिश सत्तेचा मुकूटमणी’ मानले जायचे.

भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य असताना अनेक ब्रिटिश नागरिक व्यापाराच्या माध्यमातून आपल्या आयुष्याची भरभराट करता यावी यासाठी भारतात यायचे. मात्र, हिक्कींसाठी ही वाट तितकी सोपी नव्हती. भारतात आल्यानंतर त्यांनी थोडी रक्कम कर्जाऊ घेतली होती. कर्जाची ही रक्कम वेळेत फेडू न शकल्याने लवकरच त्यांची तुरुंगात रवानगी झाली. त्यांनी तुरुंगातच छापखाना तयार करण्यासाठीची धडपड सुरू केली. त्यासाठी लागणारी साधने त्यांनी चोरमार्गाने आणली. काही सुतारांना हाताशी धरून त्यांनी तुरुंगातच छापखाना तयार केला. ते त्यांच्या खोलीतूनच काम करू लागले. सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १ वा २ वाजेपर्यंत ते काम करायचे. हॅण्डबिल्स, जाहिराती, सर्वोच्च न्यायालयाची कागदपत्रे, पंचांग अशा गोष्टी ते छापायचे. त्यांना या कामी त्यांचे सहकारी कैदीही मदत करायचे, अशी माहिती ओटिस यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे.

हिक्की यांचा छपाईचा हा उद्योग सुरू झाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर वृत्तपत्राची मागणी लक्षात घेऊन त्यांनी स्वत:चे वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले. त्याबाबत ओटिस यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे, “भारतीयांना त्यांच्या मित्र-परिवाराकडूनच बातम्या मिळायच्या; मात्र, युरोपियन लोक बातम्या मिळविण्यासाठी अनेक दशकांपासून वृत्तपत्रांवरच अवलंबून होते. त्यांच्या बातम्या युरोप आणि अमेरिकेतून यायच्या. तिकडे प्रकाशित झालेली वृत्तपत्रे जहाजातून इकडे येण्यासाठी काही महिने जायचे.” या पार्श्वभूमीवर वृत्तपत्राची मागणी लक्षात घेता हिक्की यांनी वृत्तपत्र सुरू केले. हे भारतातील आणि आशियातील पहिले वृत्तपत्र ठरले. ‘बंगाल गॅझेट’ हे भारतात सुरू झालेले पहिलेच वृत्तपत्र असल्यामुळे लवकरच प्रसिद्धीसही आले. त्यावेळी ब्रिटिश सत्ता तीन खंडांमध्ये चार जणांविरुद्ध लढाईत गुंतली होती. अमेरिकन, फ्रेंच, स्पॅनिश व मराठा या साम्राज्यांविरोधात ब्रिटिशांची लढाई सुरू असल्यामुळे त्या काळात बातम्यांसाठी अनेक विषय उपलब्ध होते.

कोणत्या बातम्या प्रसिद्ध झाल्या?

ओटिस यांनी आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार हे वृत्तपत्र शनिवारी प्रसिद्ध व्हायचे. चार पानी असलेला हा अंक एक रुपयाला मिळायचा. इंग्लंडमध्येही याच किमतीला वृत्तपत्र मिळायचे. या वृत्तपत्राची पहिली दोन अथवा तीन पाने बातम्या आणि संपादकीय मते मांडण्यासाठी असायची; तर चौथ्या पानावर जाहिराती असायच्या. राजकीय विषयांवरील बातम्यांमुळे वृत्तपत्र अडचणीत येईल; असा विचार करुन हिक्की यांनी सुरुवातीला आपल्या वृत्तपत्रामध्ये राजकीय विषयांवरील बातम्या न छापण्याचे ठरवले होते. त्याऐवजी रस्त्यांची निर्मिती अथवा दुरुस्ती यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवरच आपल्या वृत्तपत्रात लिहायचे, असा विचार त्यांनी केला होता. त्यासाठी वाचकांना स्वलिखित लेख पाठविण्याचे आवाहनही ते करायचे. ओटिस यांनी पुस्तकात नमूद केले आहे की, “हिक्की यांनी विनोदी आणि उपहासात्मक ढंगातून बातमीदारी करण्याचा प्रयत्न केला. शहरातील महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांनी काही टोपणनावेही दिली होती.”

मजेशीर आणि उपहासात्मक लिखाणाबरोबरच हिक्की यांनी कालांतराने काही महत्त्वाच्या विषयांना हात घालणारे गंभीर लिखाणही आपल्या वृत्तपत्रामध्ये केले. ईस्ट इंडिया कंपनीने शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते बांधकाम व सार्वजनिक स्वच्छतेवर अधिक भर दिला पाहिजे आणि त्यासाठी अधिक गुंतवणूक केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी आपल्या लेखांमधून केले होते. कोलकातामध्ये लागणाऱ्या आगींच्या समस्येवरही हिक्की यांनी आणखी अधिक भर दिला होता. कोलकातामधील अनेक गरीब कुटुंबे त्यांच्या छतासाठी गवत वापरायची. उच्च तापमानामुळे अनेकदा आग लागण्याच्या दुर्घटना घडायच्या. या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. ओटिस यांनी आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमवेत अनेक लोक हे वृत्तपत्र वाचायचे. जेव्हा हिक्की यांनी आगीच्या घटनेबाबत कृती करण्याचे आवाहन आपल्या वृत्तपत्रामधून केले होते, तेव्हा बंगालमधील अधिकाऱ्यांनी त्याबरहुकूम उपाययोजनाही केली होती. हिक्की यांचे हे वर्तमानपत्र दिवसेंदिवस अधिक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करू लागले. त्यामुळे त्यांनी वृत्तपत्राच्या शीर्षकाजवळ एक ब्रीदवाक्य लिहून आपला उद्देशही स्पष्ट केला होता. आपले वृत्तपत्र सर्वांची मते मांडण्यासाठी खुले असून, कुणा एकाच्या प्रभावाखाली ते नसल्याचे त्यांना दाखवून द्यायचे होते. त्यामुळे ‘ओपन टू ऑल पार्टीज्, बट इन्फ्लूएन्स्ड बाय नन’ असे ब्रीदवाक्य त्यांनी लिहिले होते.

हेही वाचा : विश्लेषण : पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची सुधारित टक्केवारी चर्चेत का? निवडणूक आयोगाला ती का जारी करावी लागली?

हिक्की यांचे बंगाल गॅझेट बंद का पडले?

हिक्की यांचे वृत्तपत्र दिवसेंदिवस दखलपात्र आणि लोकप्रिय होत असल्याचे पाहून काही लोकांनी त्याविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली. गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज आणि मिशनरी जोहान झकेरियास किरनँडर यांसारख्या व्यक्तींकडून या वृत्तपत्राविरोधात अनेक मानहानीचे खटले दाखल केले गेले. एका लेखामध्ये हिक्की यांनी वॉरन हेस्टिंग्ज यांच्या साम्राज्यवादी धोरणांवर टीका केली होती. हेस्टिंग्ज हे रॉबर्ट क्लाइव्ह यांचेच उत्तराधिकारी असून, ते जुलमी, पापी व दुष्ट असल्याची टीका त्यांनी केली होती. हिक्की यांनी अशाच प्रकारची टीका मिशनरी जोहान झकेरियास किरनँडर यांच्यावरही केली होती. त्यामुळे त्यांनी हिक्की यांच्याविरोधात मानहानीचा खटला भरला. या खटल्यांमध्ये हिक्की यांना दोषी ठरवून तुरुंगात पाठविण्यात आले. या सगळ्या प्रकरणांमुळे हिक्की आर्थिक संकटात सापडले. तुरुंगात असतानाही हिक्की यांनी काही महिने वृत्तपत्र सुरू ठेवण्याचे प्रयत्न केले. तुरुंगातून सुटल्यानंतरही आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांना आर्थिक पातळीवर बराच संघर्ष करावा लागला.

हिक्की यांच्या ‘बंगाल गॅझेट’चे महत्त्व

हिक्की यांची पत्रकारितेतील कारकीर्द अल्पकाळ राहिली असली तरीही ती महत्त्वाची ठरली असल्याचे लेखक ओटिस यांचे मत आहे. हिक्की यांच्या काही बातम्या अफवांवर आधारित आणि चटपटीत असल्या तरीही त्यांच्या वृत्तपत्राचे ऐतिहासिक महत्त्व वादातीत आहे. भारतामधील पत्रकारितेच्या पायाभरणीसाठी हिक्की यांचे योगदान अमूल्य असल्याचे ओटिस यांनी म्हटले आहे. हिक्की यांचे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी आपापली नवी वृत्तपत्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ब्रिटिश सरकारने वृत्तपत्रांवर बंदी आणत त्यांची मुस्कटदाबी केली. असे प्रयत्न करणाऱ्यांना हद्दपारीची धमकी देण्यात आली; तसेच वृत्तपत्राच्या जाहिरातदारांवरही दबाव टाकण्यात आला. ब्रिटिश सरकारची दडपशाही असूनही कोलकातामध्ये छापखाने सुरूच राहिले. भारतीय मालकीचा पहिला छापखाना १८०० साली स्थापन झाला. काही वर्षांनी बंधने शिथिल झाल्यानंतर अनेक प्रादेशिक भाषांमध्येही वृत्तपत्रे निघू लागली.

2024-05-04T10:55:41Z dg43tfdfdgfd