कांदिवली बोरिवलीमध्ये गुरुवारपासून २४ तास पाणीपुरवठा बंद

मुंबई : जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली आणि बोरिवली परिसरात २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, २ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून शुक्रवार, ३ मे रोजी रात्री १० वाजेपर्यंत आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनपर्यंत नवीन जोडरस्त्यालगत अस्तित्वात असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत गुरुवारी २ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून २४ तासांमध्ये जलवाहिनीचे अलगीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

हेही वाचा – रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

आर दक्षिण विभागातील मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शनदरम्यानची १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जीर्ण झाली असून ती बदलण्यात येणार आहे. नवीन जलवाहिनी टाकल्यानंतर भूमिगत गळतीचे प्रमाण कमी होईल आणि जलवाहिनीतील दाब वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कांदिवली पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा – मुंबई – गोरखपूर, दानापूर १२ विशेष रेल्वेगाड्या

जलवाहिनी जोडणी कामांमुळे या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

१) जनकल्याण नगर, छत्रपती शिवाजी राजे संकुल, म्हाडा वसाहत – ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील

२) लालजीपाडा, के. डी. कंपाऊंड, गांधी नगर, संजय नगर, बंदर पखाडी, भाबरेकर नगर, सरकारी औद्योगिक वसाहत, चारकोप गाव – ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद

३) म्हाडा एकता नगर, महावीर नगर, इराणीवाडी, कांदिवली गावठाण, महात्मा गांधी मार्ग, शंकर गल्ली, मथुरदास मार्ग, शांतिलाल मोदी मार्ग, खजुरिया टँक मार्ग, अडुक्रिया मार्ग व आर दक्षिण विभाग हद्दीतील स्वामी विवेकानंद मार्ग (संपूर्ण कांदिवली पश्चिम) – ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील.

४) चारकोप म्हाडा (सेक्टर – ०१ ते ०९) – ३ मे रोजी पाणीपुरवठा बंद

2024-04-26T14:39:30Z dg43tfdfdgfd