जळगाव जिल्ह्यातील अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव- पाचोरा रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी भरधाव मोटारीची धडक बसल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. धडक देणार्‍या वाहनात गांजा सापडल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. रास्ता रोको करीत वाहनांची तोडफोड करण्यात आली.

हेही वाचा >>> नाशिक : केंद्रपुरस्कृत साक्षरता परीक्षेत जिल्ह्यातील २४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण

 जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण (२६) या आशासेविका असून, रामदेववाडी गावात सेवा बजावतात. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या मुलगा सोहम (सात), सोहमेश (चार) आणि १६ वर्षाचा भाचा असे चौघे इलेक्ट्रिक दुचाकीने शिरसोलीकडे जात होते. रामदेववाडी गावाच्या पुढे घाटमार्गावर जळगावकडून येत असलेल्या मोटारीची त्यांना जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला. मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेचे कुंपण तोडून आत शिरली. अपघातात दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच सरदार चव्हाण आणि नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसपाटलाने धडक देणार्‍या तरुणांची बाजू घेतल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले. जमावाने अपघात करणार्‍या मोटारीसह तरुणांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या दुसर्‍या मोटारीचीही तोडफोड केली. दगडफेकही करण्यात आली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह आरसीपी प्लॅटून आणि पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

2024-05-07T18:23:09Z dg43tfdfdgfd