महाजालाचा पुढचा धागा

- सौरभ करंदीकर

‘जे न देखे रवि, ते देखे कवी’ - ज्यावर सूर्याचीदेखील दृष्टी पडत नाही ते कवी सहजी न्याहाळतो. विशेषतः ‘विज्ञान कथा’ या साहित्य प्रकारात याची वारंवार प्रचिती येते. कल्पनेच्या भराऱ्या आज ना उद्या सत्यात उतरतात. काही कल्पना प्रत्यक्षात यायला दशकं लागतात, तर काही शतकांनंतर आकार घेतात. आज पृथ्वीच्या कक्षेत अनेक भू-स्थिर उपग्रह भ्रमण करत आहेत. ‘भू-स्थिर’म्हणजे पृथ्वीच्या भ्रमणाच्या वेगाने फिरणारे, पर्यायाने एखाद्या भूभागावर कायमस्वरूपी स्थिर राहणारे उपग्रह. अशा उपग्रहाची कल्पना प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक आर्थर सी. क्लार्क यांनी सर्वप्रथम मांडली होती.

ज्यूल्स व्हर्न यांनी सुचवलेली विजेवर चालणारी पाणबुडी ‘नॉटिलस’ त्यांच्या ‘ट्वेन्टी थाउजंड लीग्स अंडर द सी’ या कादंबरीत १८७० साली अवतरली. विजेवर चालणारी पहिली लष्करी पाणबुडी प्रत्यक्षात निर्माण केली गेली, ती १८८८ साली. १८८९ साली व्हर्न यांच्या साहित्यात चक्क व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उल्लेख आढळतो, मात्र ‘फोनोटेलीफोटो’, अशा विचित्र नावाने! एच. जी. वेल्स यांच्या १८९८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘वॉर ऑफ द वर्ल्डस’ या कादंबरीतील ‘हीट रेज’ आज लेझर किरणांच्या स्वरूपात अवतरले आहेत. त्यांच्याच १९२३ साली प्रकाशित झालेल्या ‘मेन लाइक गॉड्स’ या कथेतील ‘व्हॉइस मेसेज’ आज आपण व्हॉट्सअॅप द्वारे एकमेकांना पाठवतो. ई. एम. फॉर्स्टर यांच्या १९०९ सालच्या ‘द मशीन स्टॉप्स’ नावाच्या विज्ञान कथेत तर चक्क सोशल मीडियाचा उल्लेख आढळतो.

‘द मशीन स्टॉप्स’मध्ये अशी कल्पना आहे, की भविष्यात पृथ्वीच्या पृष्ठभागावर जगणं अशक्य झाल्यामुळे मानवजात भूगर्भात राहते. प्रत्येक व्यक्ती एका खोलीत बंद आहे. तिचा इतरांशी संपर्क आहे, परंतु तो भिंतीवर दिसणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून. त्या भिंतींच्या माध्यमातून जगाच्या पोटात राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीशी संवाद घडू शकतो, माहितीचं आदान प्रदान होऊ शकतं, कुणालाही कुठल्याही विषयावर व्याख्यानं देता येतात, मनोरंजनाचे कार्यक्रम पाहता येतात. आणि हे सगळं एक सर्वसंयोजक मशीन घडवतं. कुणी काय करावं, पेक्षा काय करू नये, ते मशीन सांगतं. कुणाला जे काय लागेल ते मशीन पुरवतं. मानवजातीलादेखील हे मानवतंय. कुणालाच नियमाबाहेर किंवा स्वतःच्या खोलीबाहेर पडायची इच्छाच उरत नाही. प्रत्येक व्यक्तीला इतरांशी जोडणाऱ्या माध्यमाची-इंटरनेटची, आणि त्याचबरोबर जखडून ठेवणाऱ्या, काहीसं निष्क्रिय करणाऱ्या सोशल मीडियाची कल्पना फॉर्स्टरना शतकाहून अधिक काळापूर्वी सुचणं हा चमत्कारच म्हटला पाहिजे!

आजच्या इंटरनेटचं प्राथमिक रूप म्हणता येईल, अशा एका जागतिक ज्ञानकोषाची कल्पना सर्वप्रथम एच. जी. वेल्स यांच्या १९३० च्या सुमारास लिहिलेल्या निबंधांमध्ये आढळते. सतत अद्ययावत ठेवण्यात येणारा हा ज्ञानकोश कोणीही, कुठूनही, कधीही वापरू शकेल, अशी ती कल्पना होती. त्याला त्यांनी ‘वर्ल्ड ब्रेन’ असं नाव दिलं. आज आपण कुठलीही माहिती कधीही हवी असेल तर विकिपीडिया नाहीतर गूगल वापरतोय. इंटरनेट नामक ‘वर्ल्ड ब्रेन’चे आपण सगळेच लाभार्थी आहोत. केवळ जगभरातच नाही, तर विश्वात इंटरनेटचा कसा प्रसार होईल याचं कल्पनाचित्र आयझॅक असिमोव्ह यांच्या ‘द लास्ट क्वेश्चन’ या सुप्रसिद्ध विज्ञानकथेत आढळतं. १९५६ साली असिमोव्ह यांनी ‘मल्टीव्हॅक’ नावाच्या कम्प्युटरची कल्पना मांडली. हा कम्प्युटर जगभरात पसरलेला आहे. तो स्वतःहून शिकतो, स्वतःच्या चुका सुधारतो. स्वतःला अधिक प्रगत करतो. मनुष्याला त्याची काळजी घ्यावी लागत नाही. फक्त त्याचा उपयोग करून घेता येतो. जगभरात पसरलेल्या मल्टीव्हॅकचं प्रत्येक घरात एक टर्मिनल आहे. ज्यातून कुणीही त्याला प्रश्न विचारू शकतं. आणि क्षणार्धात मल्टीव्हॅक त्या प्रश्नाचं उत्तर प्रिंट करून देतो

त्याच दरम्यान, म्हणजे, १९६०च्या सुमारास अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या प्रयोगशाळांमध्ये (डार्पा) एक कम्प्युटर अनेकांना वापरता येईल, अशी सोय करण्यात आली. त्या काळात आजच्यासारखा कम्प्युटर्सचा सुळसुळाट नव्हता. शास्त्रज्ञांना आपापली कामं करून घेण्यासाठी कम्प्युटरची अपॉइंटमेंट घ्यावी लागत असे. ‘टाइम शेअरिंग’ करता यावं म्हणून अनेकांना एका कम्प्युटरला जोडण्याचं तंत्र विकसित करण्यात आलं. अमेरिकेच्या संरक्षण खात्याला सर्वात मोठी भीती होती, ती शत्रूराष्ट्रांच्या हल्ल्यात महत्त्वाची माहिती नष्ट होण्याची. अण्वस्त्रं क्षणार्धात शहरं बेचिराख करू शकत होती. लष्करी माहिती एकाच ठिकाणी ठेवणं धोक्याचं होतं. विविध शहरातील लष्करी कम्प्युटर्स एकमेकांना जोडून ठेवणारं ‘आर्पानेट’ जन्माला घातलं गेलं, ते याच भीतीतून. हेच इंटरनेटचं पहिलं रूप. १९६७ साली एकापेक्षा अधिक कम्प्युटर्स एकमेकांना जोडण्याची परिभाषा लिहिली गेली, आणि ‘मल्टीव्हॅक’ आकार घेऊ लागला.

इंटरनेटवर्क - इंटरनेट, म्हणजे विविध कम्प्युटर्सचं जाळं (नेटवर्क), असा शब्द १९७४ साली रूढ झाला. आज आपल्यापैकी अनेक जण ‘इंटरनेट’ आणि ‘वेब’ या दोन्ही संज्ञा एकच आहेत, असं मानतो. परंतु, ते तसं नाही. इंटरनेट म्हणजे वेबसाइट्सचं जाळं नव्हे. एकमेकांना जोडलेली वेब पेजेस पाहता येणं, हा इंटरनेटच्या अनेक वापरांपैकी एक आहे. ठरावीक माहितीने भरलेली ‘वेब पेजेस’ एकमेकांना जोडण्याचं तंत्रज्ञान, ‘वर्ल्ड वाईड वेब’, १९९१ साली आकारास आलं. थोडक्यात, इंटरनेट (आर्पानेट) आणि पब्लिक वेब यांच्या जन्मात जवळपास ३० वर्षांचं अंतर आहे. ‘वर्ल्ड वाईड वेब’ हा संभाषण घडवणारा ‘चेहरा’ आहे असं मानलं, तर ‘इंटरनेट’ म्हणजे संभाषणाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टीदेखील शक्य करणारा ‘मेंदू’ मानावा लागेल.

या जागतिक मेंदूचं जाळं गेल्या सहा दशकांत कुठवर पोहोचलंय आणि आपण त्यात किती गुरफटलोय याची जाणीव आपल्याला आहे का? कुठल्याही स्वरूपाची माहिती, मग ती एखाद्या देशाची जनगणना असो, किंवा एखाद्या व्यक्तीच्या दिवसाच्या आहारातल्या कॅलरीज, एकदा का इंटरनेटवर पोहोचली की ती विशेष प्रयत्न केल्याशिवाय नष्ट होत नाही. आपण पाठवलेली ईमेल, आपल्या सहलीचे फोटो, आपण वाचलेली आणि न वाचलेली सगळी पुस्तकं, या ना त्या पद्धतीने इंटरनेटच्या कब्जात जातात. आपल्या उभ्या आयुष्यात आपण कुठल्या वेबसाइट वर कधी गेलो, कोणत्या पेजवर किती काळ थबकलो, काय खरेदी केली, कोणते व्हिडीओ पहिले, कुठली गाणी किती वेळा आणि दिवसाच्या कुठल्या प्रहरी ऐकली, सोशल मीडियावर कुणाला शिव्या घातल्या, कुणाचं कौतुक केलं, किती वाजता कुठून कुठे प्रवास केला, या सगळ्याची माहिती कुठल्या ना कुठल्या कम्प्युटरवर नोंदली गेली आहे. आणि ते कम्प्युटर एकमेकांशी संलग्न आहेत. आजच्या घडीला जगात ९०० कोटी मोबाइल उपकरणं आणि इंटरनेटशी जोडलेली १,५०० कोटींहून अधिक इतर उपकरणं आहेत. एका अहवालानुसार पुढील पाच वर्षांत सुमारे १०० कोटी वेअरेबल कम्प्युटर्स (व्हर्चुअल रिअॅलिटी गॉगल्ससारखी परिधान करता येणारी उपकरणं) आणि स्मार्ट फ्रिजसारखी सुमारे १००० कोटी घरघुती उपकरणं बाजारात येतील. याशिवाय विविध सुपरमार्केट मध्ये ठेवलेल्या आर. एफ.आय.डी. चिप बसवलेल्या वस्तू तर १०,००० कोटींच्यावर पोहोचतील. ही सर्व उपकरणं, तसंच जागृत (स्मार्ट, रनिंग इन बॅकग्राऊंड) आणि निद्रिस्त (आर. एफ. आय. डी.) वस्तू माहितीचे स्रोत आहेत आणि ती माहिती इंटरनेटच्या हवाली करणार आहेत.

भारतात इंटरनेट वापराची सुरुवात १९८६ मध्ये झाली. त्या काळात केवळ लष्कर आणि ओएनजीसी यांच्याकडेच कम्प्युटर नेटवर्क्स होती. काही वर्षांनी संशोधन आणि शिक्षण विभागांना त्यांची नेटवर्क स्थापन करण्याची मुभा मिळाली. सामान्य जनतेला इंटरनेट खुलं झालं ते १९९५ मध्ये. गेल्या वर्षी घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणात असं दिसून आलं की, भारत इंटरनेट वापरात जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे! २०२४ च्या आकडेवारीनुसार अवघ्या २८ वर्षांत सर्वसामान्य इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ८८ कोटींच्या वर पोहचलेली आहे. २०२५ पर्यंत ८७ टक्के जनता इंटरनेटशी संलग्न असेल असं भाकीत वर्तवण्यात येत आहे. आज पृथ्वीतलावरील (आणि पृथ्वीच्या कक्षेतील) ६३ टक्के जनता इंटरनेटशी जुळलेली आहे. आणि ही सारी आकडेवारी दृश्य इंटरनेट बद्दलची आहे. डार्क वेब, म्हणजे दहशतवादी शक्तींपासून भुरट्या चोरांपर्यंत सर्वच वापरतात ते अदृश्य, लपलेलं इंटरनेट. प्रगतीबरोबर अपप्रवृत्ती देखील या इंटरनेटवर वाढत आहेत. ही वाढ एक्स्पोनेन्शियल (घातांकीय) आहे, त्यामुळे शंभर टक्के गाठायला एखादंच दशक पुरेसं होईल, अशी शक्यता आहे. उद्या मंगळाच्या दिशेने झेपावलो तरीही इंटरनेटची नाळ कापणं अशक्य आहे.

इंटरनेट आणि वैयक्तिक माहिती, याबद्दलची सामाजिक जाणीव ही फक्त जाहिरात व्यवस्था आणि औद्योगिक फायदेबाजीपुरती मर्यादित आहे. परंतु याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. आपण एका ‘सुपर-इंटेलिजन्स’ला जन्माला तर घालणार नाही? मानवी इतिहासाची, वर्तमानाची, संशोधनाची, विज्ञान, तंत्रज्ञानाची, निसर्गाची, त्याच्या नियमांची, शक्याशक्यतांची सार्वत्रिक माहिती या महाजालात आपण क्षणोक्षणी ओतत आहोत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स - कृत्रिम बुद्धिमतेची पाळंमुळं १९५० च्या दशकात रोवली गेली. परंतु तांत्रिक बिघाड, कम्प्युटर प्रणालींचा अपुरा वेग. ट्रेनिंग डेटाची अनुपलब्धता, इंटरनेटचा अपुरा प्रसार, इच्छुक संशोधकांची कमतरता, या आणि काही आर्थिक कारणांनी १९७० नंतर तंत्रज्ञानाच्या या शाखेला काहीशी उदासीनता आली. इंटरनेटच्या आताच्या वेगाने मात्र हे चित्र पालटतं आहे. स्वप्रेरित कृत्रिम बुद्धिमत्ता जन्माला येण्यासाठी हे पोषक वातावरण आहे. स्वतःच्या श्रेष्ठत्वाची जाणीव असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्स) इंटरनेटच्या साहाय्याने जन्म घेऊ पाहत आहे का? इंटरनेटच्या अफाट साम्राज्यावर अंकुश ठेवणं मानवी कुवतीच्या पलीकडे तर जाणार नाही ना? अशा प्रश्नांची उत्तरं पुन्हा एकदा विज्ञान कथांमध्येच सापडतील का?

आयझॅक असिमोव्ह यांच्या ‘द लास्ट क्वेश्चन’ मधील मल्टीव्हॅक एका सामान्य चौकीदाराने सहज म्हणून विचारलेल्या एका गहन प्रश्नाचं उत्तर शोधू लागतो. वर्षं, शतकं, सहस्रब्दी उलटतात, मनुष्यजातीचं स्वरूप बदलतं. स्वतः मल्टीव्हॅक देखील वैश्विक पातळीवरचा युनिव्हॅक होतो, तरीही तो प्रश्नाचं उत्तर शोधतच राहतो. युगानुयुगं उलटतात आणि उत्तर सापडतं, पण ते ऐकायला मनुष्यजातच अस्तित्वात नसते!

याउलट ई. एम. फॉर्स्टर यांच्या ‘द मशीन स्टॉप्स’ मधलं मशीन कालांतराने विचित्र वागू लागतं. अनाकलनीय नियम घालू लागतं. आणि ते न पाळणाऱ्यांना कठोर शासन करू पाहतं. मशीन बिघडतं, आणि शेवटी बंद पडतं. दुर्दैवाने मशीनवर विसंबून राहिलेली मानवजात आता ते दुरुस्त कसं करायचं हेदेखील विसरलेली असते. त्या जागतिक मशीनला पुन्हा जागृत करण्याचं तंत्रज्ञान आता हरवलेलं असतं.

इंटरनेट आपल्या आकलनाबाहेर जाईल का? त्याच्यात तांत्रिक बिघाड झाले तर त्यावर उपाययोजना करण्याची कुवत भविष्यात आपल्यात असेल का? इंटरनेट हीच पृथ्वीवर वास्तव्य करणारी सर्वश्रेष्ठ प्रजाती ठरली तर ती आपल्या जन्मदात्या मानवाबद्दल कृतज्ञता दाखवेल का? हे प्रश्न विज्ञानकथांमधून निघून लवकरच वास्तवात आले, तर आश्चर्य वाटायला नको.

(लेखक युजर एक्सपीरियन्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.)

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T05:20:49Z dg43tfdfdgfd