LOK SABHA ELECTIONS 2024 PHASE 3 VOTING: देशात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.2 टक्के, तर राज्यात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Elections 2024 Phase 3 Voting Percent Till 5 pm: लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा तिसऱ्या टप्यातील मतदान आज पार पडले आहे. सांयकाळी 5 वाजता मतदानप्रक्रिया संपली आहे. देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93 मतदारसंघांमध्ये ही तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यात 120 महिलांसह 1,300 हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ताज्या अपडेटनुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यात देशात 60.2% टक्के मतदान झाले आहे, तर महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील 26, कर्नाटकातील 14, महाराष्ट्रातील 11, उत्तर प्रदेशातील 10, मध्य प्रदेशातील 8, छत्तीसगडमधील 7, बिहारमधील 5, आसाममधील 4, पश्चिम बंगालमधील 4 आणि गोव्यातील 2 जागांवर मतदान होत आहे. याशिवाय दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या 2 मतदारसंघात देखील मतदान होत आहे. लोकसभा निवडणुका 19 एप्रिल ते 1 जून या दरम्यान एकूण सात टप्प्यांत होत आहेत. 1 जून रोजी अखेरच्या टप्पातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर देशाला नवे पंचवार्षीक सरकार मिळणार आहे.

महाराष्ट्रात या 11 मतदारसंघात लढती

सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात होऊन सायंकाळी 5 वाजता मतदान संपेल. या टप्प्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, माढा, लातूर, धाराशिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघासह देशात बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ,गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले हे जाणून घ्या.

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात किती मतदान?

  • लातूर : 55.38 टक्के
  • सांगली : 52.56 टक्के
  • बारामती : 45.68 टक्के
  • हातकणंगले : 49.94 टक्के
  • कोल्हापूर : 63.71 टक्के
  • माढा : 50.00 टक्के
  • धाराशिव : 52.78 टक्के
  • रायगड : 50.31 टक्के
  • सातारा : 54.11 टक्के
  • सोलापूर : 49.17 टक्के
  • रत्नागिरी - सिंधुदूर्ग : 53.75 टक्के

महाराष्ट्रातील तीन हाय होल्टेज लढती

महाराष्ट्रात सर्वाधिक 63.71 टक्के मतदान कोल्हापूरमध्ये झाले, तर सर्वात कमी मतदानाची नोंद हायहोल्टेज फाइट असलेल्या बारामतीमध्ये झाली आहे. बारामतीत केवळ 45.68 टक्के मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 पैकी 3 लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या ननंद-भाऊजयीमध्ये लढत होत असून या लढतीने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यानंतर साताऱ्यातील लढतीत शरद पवारांची खेळी गेम चेन्जर ठरणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या ठिकाणी शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंगातील केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यातील लढतीकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे.

2024-05-07T12:59:23Z dg43tfdfdgfd