MUMBAI NORTH CENTRAL LOK SABHA SEAT: 'वर्षा गायकवाडांना उत्तर-मध्य मुंबईची उमेदवारी म्हणजे बळीची बकरी'

VBA on Varsha Gaikwad nomination for Mumbai North Central Lok Sabha Seat: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटप पूर्ण झालं. या जागावाटपात मुंबईतील सहा जागांपैकी चार जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तर दोन जागा काँग्रेस लढवत आहे. काँग्रेसकडून उत्तर-मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, वर्षा गायकवाड यांना जाहीर करण्यात आलेल्या या उमेदवारीवर आता वंचित बहुजन आघाडीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत म्हटलं, "वर्षा गायकवाड यांना उत्तर―मध्य मुंबईमधील उमेदवारी म्हणजे बळीची बकरी !. उत्तर―मध्य जिल्ह्यामध्ये बहुसंख्य मतदार हे मुस्लिम समाजाचे असताना इथे मुस्लिम उमेदवार न देता बौद्ध उमेदवार देवून एक प्रकारे भाजपला जिंकून येण्यासाठी मोकळे रान सोडले आहे. वर्षाताईंना विचारायचे आहे की, आपण असा स्वतःचा बळी द्यायला का तयार झाल्या? की भाजपाची ही नवीन खेळी आहे?"

वंचित बहुजन आघाडीने केलेलं ट्वीट जसंच्या तसं

वर्षा गायकवाड यांना उत्तर―मध्य मुंबईमधील उमेदवारी म्हणजे बळीची बकरी !

वर्षा गायकवाड या काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ म्हणजे धारावी मतदारसंघातून लढतात आणि जिंकूनही येतात. त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे दक्षिण―मध्य मुंबईमधून खासदार म्हणून जिंकून आलेले आहेत. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडून उत्तर―मध्य मुंबईमध्ये का उभ्या राहत आहे? हा प्रश्न आहे. साधे गणित असे की, जिथे वंचित बहुजन आघाडीची पकड अधिक आहे, तिथे आपण उभे राहणे आणि जिंकण्याची अधिक संधी घेणे हे कुठल्याही शेंबड्या पोराला समजू शकते. तर हे वर्षाताई यांना का समजू नये? ज्या मतदारसंघातून त्या उभ्या राहिल्या आहेत, त्या मतदारसंघात गेल्या ५ वर्षात त्या फिरकल्या सुद्धा नाही. शिवाय उत्तर―मध्य जिल्ह्यामध्ये बहुसंख्य मतदार हे मुस्लिम समाजाचे असताना इथे मुस्लिम उमेदवार न देता बौद्ध उमेदवार देवून एक प्रकारे भाजपला जिंकून येण्यासाठी मोकळे रान सोडले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर वर्षाताईंना विचारायचे आहे की, आपण असा स्वतःचा बळी द्यायला का तयार झाल्या? की भाजपाची ही नवीन खेळी आहे? आपले शिक्षक भरतीमधील घोटाळा बाहेर काढण्याबाबतचे संकेत तर नाही ना? काँग्रेसच्या नेत्यांना तुम्हाला जिंकून आणायचे आहे की, पाडायचे आहे?

काँग्रेसवाल्यांना माहीत होते की, वंचित बहुजन आघाडी ह्या मतदारसंघातून बौद्ध उमेदवार देणार आहे, म्हणून त्यांनी तुमची बळीची बकरी केली आहे.

तुमचे वडील ज्या मतदारसंघातून म्हणजे दक्षिण मध्य मुंबईतून निवडून यायचे, तुम्ही निवडून यायच्या, ती जागा सोडून तुम्हाला उत्तर―मध्य मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांनी उमेदवारी देणे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या लागलेल्या चौकश्या रोखणे आहे, हे तुमच्या लक्षात येत आहे का? तुमच्या पक्षातील एक नाराज मुस्लिम नेता तुम्हाला जिंकण्यात मदत करणार आहे की पाडण्यात ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मतदारांना द्यावी लागतील. त्यामुळे खरंच सर्वांनी मिळून तुमची बळीची बकरी केली आहे!

2024-04-30T13:55:23Z dg43tfdfdgfd