RAJ THACKERAY SPEECH: साडेसात वर्षे सत्तेत होता, का उद्योग धंदे बाहेर जाऊ दिलेत? कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Raj Thackeray Kankavali Speech: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज कणकवलीमध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. मी सत्तेसाठी किंवा कुठल्या पदासाठी टीका केली नाही, त्यावेळी भाजपने यांचं जे काय अडीच-अडीच वर्षाचं ठरलं होतं ते मान्य केलं असतं तर हे आज जे बोलताहेत ते बोलले असते का? असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच गेल्या 10 वर्षातील साडेसात वर्षे तुम्ही सत्तेत होता मग का रोखले नाहीत बाहेर जाणारे प्रकल्प असा सवाल देखील यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित केला.

नारायण राणे निवडून आले आहेत समजा - राज ठाकरे

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, नारायण राणेंचा सभेसाठी फोन आला, त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही. राज्यातल्या 9 भारतरत्नांपैकी 7 कोकणातले आहेत. येथील लोकांना कोण आपलं भलं करू शकतं हे चांगलं समजतं. नारायण राणे निवडून आले आहेत समजा, असे ते म्हणाले.

मला जे पटतं ते मी बोलतो - राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, 2014 ते 2019 दरम्यान ज्या गोष्टी मला पसंत पडल्या नाहीत, त्याला मी जाहीर विरोध केला, त्या आजही मला पटत नाही. मला जे पटतं ते मी करतो. ज्या गोष्टी पटल्या त्यांचं जाहीर कौतुक करणारा मी माणूस आहे. जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याचा विषय सुरू होता, ते मोंदींच्या काळात झालं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. यापूर्वी ते कोणी केलं नाही. जसं काश्मीरचं झालं, तसं राम मंदिराचंही झालं. मोदी सरकार आणि सुप्रीम कोर्टामुळे राम मंदिर झालं. मोदी सरकारमुळे राम मंदिर बांधण्याची परवानगी मिळाली. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारमध्ये ती हिंमत नव्हती.

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, समजा भाजपने तुमचे अडीच-अडीच वर्षे मान्य केले असते तर आज ते जे बोलताहेत ते बोलला असतात का? सत्तेचा गोळा तोंडात कोंबला गेला असता. ते मिळालं नाही म्हणून आज हे सगळं बोलता आहात असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टिका केली.

साडेसात वर्षे तुम्हीच सत्तेत होतात - राज ठाकरे

पुढे बोलताना ते म्हणाले, मी कुठल्या पदासाठी भाजपला विरोध केला नव्हता. गेल्या 10 वर्षातील साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते, का उद्योग धंदे तुम्ही बाहेर जाऊ दिले. आपण काय बोलतोय हे यांना कळत नाही. कोकणात प्रकल्प येऊ द्यायचे नाहीत, म्हणून जैतापूर, नाणारला विरोध केला. मग म्हणे नाणार बारसूमध्ये हलवा, तिथे 5 हजार एकर जमीन सापडली. ती कोणी घेऊन ठेवली होती. ती यांच्याच लोकांनी घेऊन ठेवली होती. तुमच्याकडून 10 रुपयांना जमीन घेणार आणि सरकारकडून 200 रुपये घेणार असे यांचे धंदे सुरू आहेत. यांचा इथला हा खासदार त्यांचेही हेच धंदे सुरु आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी विनायक राऊतांवर देखील हल्ला चढवला.

राणेंनी जसं मुख्यमंत्रीपद सांभाळलं ते कोणालाही जमलं नाही - राज ठाकरे

राणेंनी जसं मुख्यमंत्रीपद सांभाळलं ते आजपर्यंत कोणालाही जमलं नाही. त्यांची विषय समजून घेण्याची क्षमता उत्तम होती. राणे 5 वर्षे मुख्यमंत्री असते तर आज प्रचारासाठी येण्याची गरज पडली नसती. असा माणून तुमच्यासमोर उमेदवार आहे. त्यामुळे बाकड्यावर बसणारा खासदार हवा आहे, की कोकणाचा विकास करणारा? असा सवाल करत राज ठाकरे यांनी नारायण राणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

2024-05-04T16:26:32Z dg43tfdfdgfd