WATER SHORTAGE: राज्यावर नवं संकट, या भागातील 2344 गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Water Tankers: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या हवामान बदलामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यात अजुनही उष्णतेची लाट आहे. यामुळे राज्यातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. राज्यात आता सरासरी 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. काही जिल्ह्यांमधील परिस्थिती अतिशय बिकट आहे. राज्यात सध्या 2344 गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यातील कोणत्या विभागात काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात...

गेल्या वर्षी राज्यात कमी पाऊस झाला होता त्यामुळे आणि यंदा आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील विविध धरणांमधील पाणीसाठी सरासरी पेक्षा कमी झाला आहे. सध्या धरणांमध्ये केवळ 28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, मात्र गेल्यावर्षी हाच पाणीसाठी 40 टक्के इतका होता. सर्वाधिक पाणीटंचाईचा सामना छत्रपती संभागीनगर विभागातील नागरिकांना करावा लागत आहे. या भागात फक्त 11.89 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टँकरची संख्या वाढली

राज्यात पाणीसंकट निर्माण झाल्याने टँकरची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्यात गेल्या वर्षी या काळात 111 गावांना आणि 259 वाड्यांना 101 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, मात्र आता टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात सध्या 2344 गावे आणि 5749 वाड्यांना 2952 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 636 टँकरद्वारे 393 गावांना आणि 59 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर जालन्यात 442, बीडमध्ये 310, नाशिकमध्ये 294, अहमदनगरमध्ये 267, सांगलीत 183 आणि पुण्यात 169 टँकर्सनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पाणीसंकट आणखी तीव्र होणार?

राज्यात वाढत्या उष्णतेमुळे पाणी साठ्यांमध्ये कमालीची घट होत आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीसंकट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्यातील टँकरची संख्या आणखी वाढण्याती शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार

भारतीय हवामान खात्याने 2024 मध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार यावर्षी संपूर्ण देशात सरासरी 87 सेमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तो जून ते सप्टेंबर या कालावधीत होईल. हा पाऊस सरासरीच्या 106 टक्के असेल असे देखील हवामान खात्याने म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यंदा पडणारा पाऊस वेळेवर पडल्यास राज्यावरील पाणीसंकट दूर होऊ शकते, अन्यथा हे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे पाणी संकट वाढल्यास सरकारला टॅंकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

2024-05-05T03:58:26Z dg43tfdfdgfd