ईव्हीएम हॅक करणाचा दावा करणाऱ्या जवानाचं सत्य आलं समोर; दानवेंना दिली होती ऑफर

छत्रपती संभाजीनगर, (अविनाश कानडजे, प्रतिनिधी) : अडीच कोटी रुपये द्या ईव्हीएम हॅक करून तुमच्या उमेदवाराला जिंकून देतो असं सांगणाऱ्या एका व्यक्तीला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हा आरोपी भारतीय सैन्यात हवलदार म्हणून काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मारुती नाथा ढाकणे असे या माणसाचं नाव आहे. या आरोपीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोन करून अशा पद्धतीची ऑफर दिली होती. यावर आता अंबादास दानवे यांनी खुलासा केला आहे. तर पोलिसांनीही हा आरोपीची सहानिशा करुन सत्य समोर आणलं आहे.

एक व्यक्ती मला सारखा फोन करून इलेक्शन मॅनेजमेंट करता येते असं सांगत होता. तो भारतीय सैन्यात मेजर असल्याचे देखील सांगत होता. मॅनेजमेंट करता येते असे म्हणल्यावर मला नातेवाईक किंवा जवळची व्यक्ती यांच्या मतामध्ये जास्तीत जास्त परिवर्तन करेल असा माझा समज होता. त्यामुळे मॅनेजमेंट म्हणून मी त्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं. इलेक्शन काळातली गोष्ट असल्यामुळे मी दुर्लक्ष केलं. पण सारखे कॉल येत असल्यामुळे मी मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय हे बोलण्याचं ठरवलं. त्याच्याशी बोललो तेव्हा मला धक्काच बसला, त्याने मला सांगितलं की मी ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो. माझ्याकडे चीफ आहे, सर्वच्या सर्व मतदान केंद्रावर तसं करता येईल. जसं पाहिजे तसं मतदान इथे नाही तर कुठेही करू शकतो असे तो सांगत होता. मात्र, या गोष्टी शक्य नसल्याचे मला माहिती होते.

आपल्या लोकशाहीमध्ये अनेक यंत्रणा आहेत. त्यामध्ये कुठे ना कुठे या गोष्टी अडकत असतात. त्यामुळे या यंत्रणा एवढ्या सोपं नसतात, असं काही असल्यास कुणी ना कुणी अधिकारी सांगतोच की असं होतंय, सर्वच अधिकारी निवडणूक आयोग आणि सत्ताधिकार्‍यांना बांधलेले नाहीत, आमच्याही विचाराचे लोक असतात. त्यामुळे या गोष्टी होऊ शकत नाही असं मला ठाम विश्वास होता. तरी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण एखाद्या माणसाला जीवनातून उठवणे योग्य नाही. तरी देखील तो माझ्या मागे लागल्यानंतर मला त्याने ऑफर दिली की मला अडीच कोटी द्या, मी अडीच कोटी कुठून देणार मी अडीच लाख देऊ शकत नाही. मात्र, त्याचं सतत हे चालू असल्यामुळे मी पोलीस आयुक्तांना फोन करून माहिती दिली, त्यांनी काही अधिकारी माझ्याकडे पाठवले माझी आणि त्यांची चर्चा झाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.

आमचा दीड कोटीत व्यवहार ठरला. माझ्या भावाच्या माध्यमातून एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यावेळी पोलिसांनी त्याला ट्रॅप करून पकडले आणि अटक केली. माझा उद्देश त्याला अटक करणे, त्रास देणे नाही तर जनतेमध्ये ईव्हीएम मशीन बद्दल जनजागृती व्हावी एवढाच आहे. अशा पद्धतीने कोणी सांगत असेल तर त्याला पोलिसाच्या ताब्यात दिले पाहिजे. देशाच्या लोकशाहीने निवडणूक विभागाने यंत्रणा ठेवली असेल तर त्याच्यावर विश्वास निर्माण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. बॅलेट होता तेव्हा देखील आपण यंत्रणेला नाव ठेवलं होतं, अटल बिहारी त्यावेळेस बाईचा चमत्कार की शाईचा चमत्कार म्हणत होते. प्रत्येक गोष्टीत गुणदोष असतात. पण जी व्यवस्था आता आहे, त्याच्यावर विश्वास निर्माण करणे आपल्या सर्वांचे काम आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

वाचा - जालन्यात मराठा आरक्षणासाठी मुलाची आत्महत्या? 2 महिन्यांनी बापाचा बनाव उघड

पोलीस तपासात सत्य समोर

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ऑफर देणारा व्यक्ती भामटा चोर आहे. भारतीय सैन्यात तो जवान आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या तो ड्युटीला आहे. त्याच्यावर मोठे कर्ज झाले असल्याने भामटेगिरी करून हा बनाव केलेला आहे. ईव्हीएम हॅक करतो असे त्याने सांगितले. मात्र, प्रत्यक्षात त्याला कुठलेही नॉलेज नाही. त्याच्यावर कर्ज झालेले होते ते पैसे कुठून तरी मिळावे त्यासाठी त्याने हे सर्व केलं असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली.

2024-05-07T14:17:47Z dg43tfdfdgfd