फडणवीसांसोबतचं सरकार का पडलं? अजितदादांनी पहिल्यांदाच सांगितली INSIDE STORY

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये अजित पवारांनी 2019 चा देवेंद्र फडणवीसांसोबतचं सरकार का पडलं? याबाबत पहिल्यांदाच माहिती दिली आहे.

'2014 साली बाहेरून पाठिंबा दिला. 2017 सालीही भाजपसोबत जायचं ठरलं होतं, पण तेव्हा शिवसेनेला बाजूला करण्याची मागणी केली गेली, पण या प्रस्तावाला अमित शाहांकडून नकार देण्यात आला. वारंवार भूमिका बदलल्या गेल्या. भाजपला पाठिंबा ही रणनिती म्हणतात, पवार साहेबांनी केली की रणनीती, मग आम्ही केलं की गद्दारी कशी? 2019 साली मुंबईत झालेल्या बैठकीत खर्गेंसोबत वाद झाला होता. राष्ट्रपती राजवट कुणामुळे हे विचारा', असं अजित पवार म्हणाले.

'शपथविधीबाबत ज्येष्ठांना माहिती होतं, मोजक्या लोकांना शपथविधीची माहिती होती. काँग्रेसच्या आमदारांचीही तयारी होती. एका उद्योगपतीलाही शपथविधीची माहिती होती. गुप्त मतदानाचा निर्णय फिरल्यामुळे सगळं फिस्कटलं', अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

'आम्ही गद्दारी केलेली नाही, आम्ही आमचा मार्ग निवडला आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमच्यासोबत आहेत. कार्यकर्त्यांचं आम्हाला पाठबळ आहे. शिंदे सुरतेत असतानाही सरकारमध्ये जायची तयारी केली होती. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची सहमती होती. शरद पवारांनाही याबाबतची माहिती होती. राष्ट्रवादीने तीन जणांची समिती नेमली. त्रिसदस्यीय समिती अमित शाहांसोबत चर्चा करणार होती. दुरध्वनीवरून अमित शाह यांनी चर्चेला नकार दिला. समोरासमोर बसून चर्चा करण्याचा अमित शाह यांचा प्रस्ताव होता. शरद पवारांनी अनेकदा भूमिका बदलली', असा आरोप अजित पवारांनी केला.

2024-04-26T16:05:19Z dg43tfdfdgfd