Covishield vaccine: कोविशील्डमुळे वाढले हार्ट अटॅकचे प्रकरण? या गोष्टी किती तथ्य
अॅस्ट्राझेनेका या ब्रिटनमधल्या फार्मास्युटिकल कंपनीने अशी कबुली दिली आहे, की त्यांच्या कंपनीने विकसित केलेल्या कोविड-19 लशीमुळे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात. भारतातल्या सिरम इन्स्टिट्यूटने अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या फॉर्म्युलापासूनच कोविशील्ड लस उत्पादित केली होती. ब्रिटनमधल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीच्या विरोधात 51 खटले सुरू असून, त्यांपैकी अनेक खटल्यांमध्ये असा आरोप ठेवण्यात आला आहे, की त्या लशीमुळे प्राण गेले आहेत. तसंच अनेक जण गंभीररीत्या आजारी पडले आहेत. या संदर्भात भारतातले डॉक्टर्स काय म्हणतात, याविषयी जाणून घेऊ या. ज्या डॉक्टर्सनी कोरोना महासाथीचा बारकाईने अभ्यास केला होता, त्यांच्याशी इंडिया टुडेने संवाद साधला. आज तकने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये न्यूरॉलॉजिस्ट असलेल्या डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं, की अॅस्ट्राझेनेका कंपनीने कोर्टात असं सांगितलं आहे, की कोविशील्ड आणि वॅक्सझेवरिया ब्रँडनेमने विकल्या जाणाऱ्या त्यांच्या लशीमुळे टीटीएस अर्थात थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम विथ थ्रोम्बोसिस हा साइड इफेक्ट होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याआधीही कोविडसह अन्य लशींच्या प्रतिकूल प्रभावामुळे अॅक्वायर्ड टीटीएसची नोंद झाली आहे. टीटीएस म्हणजे एक अशी दुर्मीळ परिस्थिती, ज्यात रक्त गोठू लागतं आणि रक्तात प्लेटलेट्सची संख्या कमी होत जाते. डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितलं, की लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट झालेच, तर ते एक ते सहा आठवड्यांत दिसून येतात. त्यामुळे भारतात त्यांनी दोन वर्षांपूर्वी लस घेतली होती, त्यांनी घाबरण्याची काहीही गरज नाही. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहअध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितलं, की लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर पहिल्या महिन्यातच साइड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात, त्यानंतर नाही. डॉ. जयदेवन यांनी असंही सांगितलं, की 'हे सारं ब्रिटनमधल्या माध्यमांनी प्रसारित केलं आहे. लशीमुळे होणाऱ्या टीटीएसवर आधीही चर्चा झाली आहे. डब्ल्यूएचओने मे 2021मध्ये यावर एक रिपोर्टही प्रसिद्ध केला होता.' डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की लशीनंतर टीटीएस झाल्याच्या प्रकाराची अद्याप भारतात नोंद झालेली नाही. वेगवेगळ्या प्रकरणांत त्याची नोंद झाली आहे. कोविड लसीकरणानंतर टीटीएस होणं खूप दुर्मीळ आहे. ब्रिटन आणि युरोपीय संघात आतापर्यंत 1.7 कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली असून, गेल्या आठवड्यापर्यंत टीटीएसची 40 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. डॉ. सुधीर असंही म्हणाले, की 2021पासून कोविड लसीकरणानंतर जगभरात टीटीएसची अनेक प्रकरणं घडली आहेत. हे खुलासे नवे नाहीत. डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की टीटीएस हा विकार 100 वर्षांपासून आपल्याला माहिती आहे. 1924 साली पहिल्यांदा या विकाराची नोंद झाली होती. डॉ. सुधीर यांनी सांगितलं, की कोविड लसीकरणामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढू शकतो; मात्र ती जोखीम खूप कमी आहे. कार्डिअॅक अरेस्ट किंवा हृदयविकाराचा झटका येण्यामागे लसीकरणाचं कारण असण्याची शक्यता नगण्य आहे. भारतासह अन्य अनेक देशांतल्या वैज्ञानिक संशोधनात हे सिद्ध झालं आहे. कोविडचा संसर्ग झाल्यास रक्ताच्या गुठळ्या बनण्याचा धोका वाढतो. तो कोविड लसीकरणाच्या तुलनेत किती तरी अधिक आहे. तरुणांना हृदयविकार होण्यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, डायबेटीस, कमी झोप, ताण, हाय कोलेस्टेरॉल, पॅकेज्ड फूड अशी अनेक कारणं असू शकतात. कोविड संसर्गामुळे हृदयविकाराचा धोका वाढला; मात्र खूपच कमी प्रकरणांमध्ये हृदयविकाराला कोविड लस कारणीभूत असू शकेल, असं डॉ. सुधीर म्हणाले. तरुणांना हृदयविकार होण्यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, डायबेटीस, कमी झोप, ताण, हाय कोलेस्टेरॉल, पॅकेज्ड फूड अशी अनेक कारणं असू शकतात. कोविड संसर्गामुळे हृदयविकाराचा धोका वाढला; मात्र खूपच कमी प्रकरणांमध्ये हृदयविकाराला कोविड लस कारणीभूत असू शकेल, असं डॉ. सुधीर म्हणाले. टीटीएस हा विकार एन्फ्लुएंझा, न्यूमोकोकल, एच वन एन वन, रेबीज आदी विकारांच्या लसीकरणामुळेही झाल्याच्या नोंदी आहेत, असंही डॉ. सुधीर यांनी सांगितलं. कोविड लशींची तुलना करण्यासाठी पुरेसा डेटा नसल्याचंही ते म्हणाले. डॉ. जयदेवन यांनी सांगितलं, की कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लशी प्रभावी आहेत. प्रत्येक लस आणि उपचारांचे काही ना काही साइफ इफेक्ट्स असतात. भारतात लस घेतलेले कोट्यवधी नागरिक जिवंत आहेत आणि व्यवस्थित आहेत. लशीचा वापर झाला नसता, तर अनेक जण आज जिवंत असले नसते.
2024-05-02T17:07:22Z
Goa News : काणकोणात समुद्रकिनारी बारमाही पर्यटक
काणकोण; पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकूण 106 किलोमीटर किनारपट्टी आहे. त्यातील एकट्या काणकोण तालुक्यात 26 किलोमीटर किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने येथील किनार्यांवर देशी तसेच विदेशी पर्यटकांची गर्दी असते. सुट्टीच्या दिवसात तर देशी पर्यटक आपल्या कुटुंबीयांसमवेत किनार्यांवर मौजमजा करायला आलेले असतात. काणकोण तालुक्यात पाळोळे, ओवरे, पाटणे, आगोंद, खणगिणी-खोला, गालजीबाग, तळपण, देवावेळ, धारवेळ, पोळे, …
2024-05-02T02:07:26Z